नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांमधील नायिकांनी भरभरून शुभेच्छा देतानाच स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण यांविषयी रोखठोक मते मांडली आहेत. ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रता प्रधानने नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देत, महिलांनी स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ‘संसाराचा गाडा सांभाळताना मुलांचे संगोपन करणारी, नोकरी करून घराला आधार देणारी ‘ती’ ही कर्ती स्त्रीच असते. या कर्त्या स्त्रीचा सन्मान व्हायलाच हवा,’ असे मत नम्रताने व्यक्त केले. ‘छत्रीवाली’ मालिकेमधून मधुराच्या रूपात हीच कर्ती स्त्री साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंदही नम्रताने या निमित्ताने व्यक्त केला.
‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवतीने संसारासोबतच शिक्षणाचा ध्यासही घेतला आहे. लग्नानंतर संसारातच अडकून न राहता आपले छंद आपल्या आवडी-निवडी प्रत्येक स्त्रीने जपायला हव्यात, असे तिला वाटते. इच्छेपुढे आभाळही ठेंगणे असते. स्त्री शिक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंबाला ती योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळेच लग्नानंतरदेखील रेवती म्हणजेच ‘छोटी मालकीण’ आपले शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
‘नकळत सारे घडले’मधील नेहा म्हणजेच नुपूर परुळेकरच्या मते परंपरेसोबतच आधुनिक विचारांची कास धरणेही महत्त्वाचे आहे. गगनभरारीचे स्वप्न पाहण्याचा आणि ते सत्यात उतरवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. मालिकेत नेहाच्या रूपात आदर्श आई, आदर्श सून, आदर्श पत्नी ते यशस्वी डॉक्टर या भूमिकेत वावरायला मिळत असल्याचा विशेष आनंद नेहाला वाटतो.
‘ललित २०५’मधील भैरवी म्हणजेच अमृता पवारच्या मते स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती होती, आहे आणि राहणारच. त्यामुळेच कितीही दु:खाचे कसोटीचे प्रसंग आले, तरी ती त्याचा सामना खंबीरपणे करू शकते. हाच खंबीरपणा भैरवीमध्ये आहे. ‘आपल्यातील खऱ्या शक्तीचा शोध घेतला, तर कोणतीच गोष्ट अवघड नाही,’ असे अमृता पवारला वाटते.